
जळगाव -जळगावात विकास रखडला असून मी त्यासाठी जळगाव शहराच्या विकासासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. जळगाव शहरात १० वर्षात आमदारांनी काम केले नसून. मला त्रास देण्यात आला. उपमहापौर असताना आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष निवडीवेळी मला डावलण्यात आले. मी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. माझा निर्णय ठाम असून दि.२८ किंवा २९ रोजी अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी काल सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ.अश्विन सोनवणे म्हणाले की, भाजपात अनेकजण नाराज असून मी सर्व नाराजांची भेट घेणार आहे. सर्वांना मतदानासाठी आवाहन करणार आहे. विद्यमान आमदार पक्ष सोडून दोन वेळा काँग्रेसमध्ये गेले आणि पुन्हा भाजपात आले तरी त्यांना उमेदवारी देण्यात आली. मी २५ वर्षापासून एकनिष्ठ असून देखील डावलण्यात आले. जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात कुठेही कोळी समाजाला उमेदवारी देण्यात आलेली नाही. मला सर्व समाज, जाती धर्मालासोबत घेऊन शहराचा विकास करायचा असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.