जळगाव

जैन इरिगेशनच्या आधुनिक कृषी उच्चतंत्रज्ञानाचे योगदान अधोरेखित

नवी दिल्ली, दि. २८ (प्रतिनिधी) : आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय तसेच जागतिक शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांना ‘अमित कृषी ऋषी अवॉर्ड २०२५’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. अमित सिंह मेमोरियल फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्यातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार आधुनिक शेतीतील नवोन्मेषी, ठिबक, तुषार सिंचन, टिश्युकल्चर या सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा कामगिरीबद्दल दिला जातो. अनिल जैन यांच्यावतीने हा पुरस्कार कंपनीचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ. के.बी. पाटील यांनी स्वीकारला. या पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील जळगावची जैन इरिगेशन ही कंपनी राष्ट्रीय पातळीवर कृषी क्षेत्रातील एक आदर्श संस्थान म्हणून अधोरेखित झाली.

पुरस्कार वितरण सोहळा बिहार कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेत करण्यात आले होते. हा कार्यक्रम डॉ. एच. पी. सिंग (राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचे माजी अध्यक्ष) यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी डॉ. एस. एन. झा (भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक, अभियांत्रिकी), डॉ. संजय कुमार (भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शास्त्रज्ञ नियुक्ती मंडळाचे चेअरमन), डॉ. आलोक के. सिक्का (अंतरराष्ट्रीय पाणी व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख) तसेच डॉ. ए. आर. पाठक (माजी कुलगुरू) या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

जैन इरिगेशनने गेल्या सहा दशकांत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, टिश्यू कल्चर, प्रक्रिया केलेले अन्न व सौर ऊर्जा यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करून ते शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवले आहे. जैन इरिगेशनचे ठिबक सिंचन तंत्रज्ञान भारतातच नव्हे तर आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया व मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये वापरले जात आहे. त्यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याची संधी मिळून लाखो शेतकरी आत्मनिर्भर झाले आहेत.

“हा पुरस्कार केवळ माझा नसून जैन इरिगेशनमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, कंपनी आणि विकसीत नवतंत्रज्ञान वर विश्वास ठेवणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा आहे. भारताच्या ग्रामीण भागात नवतंत्रज्ञान पोहोचवून शेतीला आधुनिक व जलयुक्त, शाश्वत करणे, हे उद्दिष्ट आहे.” अशी प्रतिक्रिया अनिल जैन यांनी व्यक्त केली.

डॉ. एच. पी. सिंग यांनी आपल्या भाषणात जैन इरिगेशनच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला, ते म्हणाले की, “भारतीय शेतीला टिकवण्यासाठी आणि हवामान बदलाच्या संकटातही ती सक्षम करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जैन इरिगेशनने हे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले याचे मोठे श्रेय अनिल जैन यांच्या दूरदृष्टीला जाते.” या कार्यक्रमास कृषीतीर्थ मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांच्यासह कृषी संशोधक, देशभरातील शास्त्रज्ञ व शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button