जळगाव

संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली सपत्नीक पूजा

जळगाव, दि. १० (प्रतिनिधी) : जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पवित्र मार्गावर निघालेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्याचे जैन हिल्स येथे भक्तिपूर्ण वातावरणात हरी नामाचा जयघोष या सोबत टाळ-मृदुंगाच्या निनादात स्वागत करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या वतीने १५२ वर्षांची परंपरा असलेल्या वारीचे भक्तिभावाने स्वागत करून आदरातिथ्य केले.

पालखीचे स्वागत व पाद्यपूजा
जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पालखी आगमनानंतर संस्थानचे गाधीपती ह.भ.प. मंगेश जोशी महाराज यांची व श्री संत मुक्ताबाईंच्या पावन पादुकांची पाद्यपूजा जैन इरिगेशनचे अध्यक्ष मा. अशोक जैन व सौ. ज्योती जैन यांनी केली. यावेळी सौ. शोभना अजित जैन व डॉ. भावना अतुल जैन यांनीही भक्तिभावाने पूजनात सहभाग घेतला.

सेवाभाव व श्रद्धेचा संगम
पालखीच्या स्वागतासाठी मानव संसाधन विभागाचे वरिष्ठ अधिकारी पी.एस. नाईक, एस.बी. ठाकरे, जी.आर. पाटील, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन तसेच मीडिया विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. वारकऱ्यांसाठी विशेष फराळ व अल्पोपहाराची व्यवस्था राजाभोज विभागातर्फे करण्यात आली होती.

पालखीबरोबर सेवा वाहनाची साथ
जैन इरिगेशनतर्फे पालखी सोहळ्यासाठी प्रत्येक वारीला खास सेवा वाहन उपलब्ध करून देण्यात येते ते याही वर्षी देण्यात आले आहे. संपूर्ण वारीदरम्यान या वाहनाचा पालखीबरोबर उपयोग होणार आहे. वाहनाची ही सुविधा वारीतील अवजड वस्तू वाहून नेणे, वृद्ध, महिला व गरजूंच्या मदतीसाठी मोठे उपयुक्त ठरते.

अखंड वारसा आणि ५२ दिवसांचा पायी प्रवास
श्री संत मुक्ताबाई राम पालखी दिंडी सोहळ्यास कान्हदेशचे संत आप्पामहाराज (श्रीराम मंदिर संस्थान, जळगावचे गादीपती आद्य पुरुष) यांनी १८७२ मध्ये सुरूवात केली. तेव्हापासून अखंडपणे ही पालखी दरवर्षी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जळगाव येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. वारीचा जळगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते जळगाव असा ५२ दिवसांचा, सुमारे ११०० कि.मी.चा पायी प्रवास असतो. वारीमध्ये ‘जय जय रामकृष्ण हरी’ चा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि शेकडो वारकऱ्यांचे श्रद्धेने ओथंबलेले पदस्पर्श या साऱ्यांनी वातावरण भारावणारे असते. यावर्षाच्या वारीचे वैशिष्ट्य असे की, वृक्षारोपणाचे महत्त्व त्या त्या गावांना पटवून सांगण्यात येऊन घनदाट सावली देणाऱ्या वृक्षांचे रोपणही करण्यात येणार आहे. या ईश्वरी कार्यास अशोक जैन यांनी शुभेच्छा दिल्या.

जैन हिल्स येथे “कृषी” आणि “ऋषी”चे घडते दर्शन
कंपनीच्यावतीने वारकऱ्यांना दिले गेलेले प्रेम, भक्तिभाव, आदरातिथ्य व सेवा हे संत संस्कृतीच्या सजीव परंपरेचे मनमोहक दर्शन घडवणारे म्हणता येईल. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्रद्धेय भवरलालजी जैन अर्थात मोठ्याभाऊंनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यामागची संकल्पना अशी आहे की, “असी”, “मसी”, “कृषी” आणि “ऋषी” ही चार संकल्पना एकत्र केल्यास, ती संस्कृतीचा एक मोठा भाग दर्शवतात. “असी” आणि “मसी” हे धार्मिक किंवा तत्त्वज्ञानाशी संबंधित शब्द आहेत, तर “कृषी” आणि “ऋषी” शेती आणि ज्ञानाशी संबंधित आहेत. या चारही बाबींचा जैन हिल्स येथे सुरेख संगम झालेला आहे. निसर्गाने फुललेल्या या जैन हिल्स येथे दरवर्षी मनोभावे पंढरीला जाणाऱ्या दिंडीचे भक्तीभावाने जैन परिवार व विस्तारीत जैन परिवारातर्फे स्वागत केले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button